दृढनिश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडा-जवळ गेला. झाडावरून प्रेत खाली काढून त्याने ते आपल्या खांद्यावर टाकले. आणि स्मशानाकडे जाऊं लागला. तेव्हां प्रेताच्या आंत बसलेला वेताळ त्याला म्हणाला ‘‘राजा, या निबिड अंधारात तू कुठे जातो आहेस? आपला जीव फुकट धोक्यांत कां घालतो आहेस? जर तुला असं वाटत असेल की कोणतेही ध्येय गांठायला कठोर परिश्रम हा एकमेव मार्ग आहे, तर हे चुकीचे आहे. माधवचेच उदाहरण घे. तो एक सामान्य माणूस होता. त्याने कांही कठोर परिश्रम केले नाहीत पण त्याने चमत्कार घडवले. अशा माधवला देखील मंत्र्याने दुर्लक्षिले. त्याला दुष्ट, अज्ञानी म्हटले. त्या दोघांची गोष्ट माझ्याकडून ऐक आणि स्वतःला सुधार’’.
असे म्हणून वेताळ गोष्ट सांगू लागला.
माधव हा एक साधा माणूस होता. गांवात त्याला चांगला मान होता. त्याची पत्नी सुस्वभावी होती. त्याला एक मुलगा आणि मुलगी होते. आपल्या बायकोमुलांबरोबर तो मोठ्या सुखांत आयुष्य घालवत होता.
एक दिवस माधव सहकुटुंब राजधानी पहायला निघाला. तिथे पोचायला त्यांना एका छोट्याशा जंगलातून जावे लागणार होते. जेव्हां ते चौघे जंगलातून जाऊं लागले तेव्हां दोन चित्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. माधवने मोठ्या कष्टाने स्वतःला वांचवले पण त्याच्या मुलांना आणि बायकोला चित्त्यांनी मारुन टाकले.
या आकस्मिक घटनेने माधव अतिशय दुःखी झाला. तो आपल्या गांवी परत गेला. सर्व जमीनजुमला विकून दुसर्या गांवी रहायला जावे म्हणून निघाला. त्या गांवात त्याचा सुदर्शन नांवाचा एक दूरचा नातेवाईक होता. त्याने माधवला आपल्या घरांत रहायला जागा दिली.
सुदर्शन व्यवहारी आणि चतुर होता. थोड्या पैशांसाठी खोटं बोलायला तो मागेपुढे पहात नसे. माधवकडे खूप पैसाअडका आहे, म्हणून माधवला आपण आपलंस करुं, असं त्याला वाटत होतं.
पण बघता बघता माधव त्या गांवातल्या लोकांचा आवडता मित्र बनला. गरजू लोकांना पैसे देऊं लागला. त्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवूं लागला. अशा तर्हेने त्याचे खूप चांगले नांव झाले.
त्या दिवसांत भीम नांवाच्या एका खेडुताच्या घरी चोरी झाली. मोठ्या कष्टाने भीमने ते पैसे जमवले होते. चोराने सर्व पैसे चोरुन नेले. त्याच गांवच्या एका सावकाराला त्याला पैसे द्यायचे होते. पैसे दिले नाही तर घराचा लिलांव करायची सावकाराने त्याला धमकी दिली. आपली ही कर्मकहाणी त्याने माधवला सांगितली.
‘‘ते कर्ज फेडायला तर मी तुला नक्कीच मदत करीन. पण ज्याने तुझ्या मेहनतीची कमाई चोरलीय, त्याचं कधी भलं होणार नाही. ज्या हातांनी त्याने चोरी केली ते तुटून जातील. जो पैसा त्याने चोरला, त्याचा उपयोग त्याचे क्रियाकर्म करायलाच होईल’’. असे म्हणून माधवने त्याला कांही पैसे दिले.
यानंतर एक विचित्र घटना घडली. भीमच्या घरी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा शेजारी नारायणच होता. त्या रात्री तो बैलांना चारा घालत असताना एका बैलाने शिंग मारुन त्याला जखमी केले. त्यांत त्याचे दोन्ही हात मोडले. तो मलमपट्टी करायला बाहेर पडणार, एवढ्यांत तिथे कांही दुसर्या कामासाठी आलेल्या सुदर्शनने ते पाहिले. तो म्हणाला ‘‘नारायण, आमच्या माधवाने शाप दिला होता कीं भीमच्या घरी ज्याने चोरी केली असेल त्याचे हात तुटतील. त्याच्या बोलण्यांत अद्भुत शक्ती आहे. तुझे तुटलेले हात बघून माझी खात्री पटूं लागली आहे, कीं तूंच भीमच्या घरी चोरी केली आहेस. भीमचे पैसे त्याला परत कर. नाहीतर माधवच्या शापानुसार ते पैसे खरोखरच तुझे क्रियाकर्म करण्यास उपयोगी होतील’’.
नारायण घाबरला. त्याने आपला गुन्हा लगेच कबूल करून भीमचे पैसे त्याला परत केले. आणि पळत पळत माधवकडे जाऊन आपला शाप परत घ्या, अशी त्याची विनवणी करुं लागला.
‘‘काय म्हणालास? मी तुला शाप दिला? भीमचे दुःख पाहून मला राग आला आणि मी जे काही तोंडाला येईल ते बोललो. बरं झालं. मी कांही म्हणायच्या अगोदरच तू तुझीचूक सुधारलीस. काळजी करुं नकोस. तुझ्या हाताची हाडें तुटलेली नाहीत, तू दोन दिवसांत बरा होशील’’. माधवने त्याची समजूत घालीत म्हटले.
आश्चर्याची गोष्ट अशी की दोनच दिवसांत त्याच्या जखमा भरल्या आणि तो बरा झाला. सुदर्शनने या संघीचा फायदा घेऊन गांवात सगळीकडे असा प्रचार सुरुं केला कीं माधवच्या वाणींत अद्भुत शक्ती आहे.
सुदर्शनने ही गोष्ट माधवपासून मात्र लपवून ठेवली. माधवच्या तोंडून शुभ उद्गार निघण्यासाठी व अशुभ बोलणे न येण्यासाठीं तो गांवच्या लोकांकडून पैसे घेऊं लागला.
माधवच्या जवळ रोज लोकांची रोज गर्दी होऊं लागली. थोड्या दिवसांनी माधवला त्याचे कारण समजले. त्याच्या नांवावर सुदर्शन लोकांना फसवीत आहे, हे त्याच्या लक्षांत आले. जेव्हां हे त्याच्या सहनशक्तीपलीकडे गेले तेव्हां तो कोणाला न सांगता एका रात्री तो ते गांव सोडून निघून गेला.
तो रात्रभर चालतच राहिला. जेव्हां सकाळ झाली तेव्हां त्याला कडकडून भूक लागली. तो मनांतल्या मनांत विचार करुं लागला, जर कोणी मला आपल्या घरी घेऊन जाऊन छान चवदार अन्न खायला देईल, तर काय मजा येईल!
त्याचवेळी एक घोडागाडी तिथे येऊन थांबली. त्या गाडींत बसलेल्या श्रीमंत माणसाने माधवला आपल्या घरी नेऊन स्वादिष्ट जेवण दिले.
माधवला कळेना की हे खरं आहे कीं स्वप्न! त्याने त्या धनवानाला आपली सर्व हकिगत सांगितली.
धनवान म्हणाला, ‘‘मला पण असंच वाटतं की आपल्यामधे दैवीशक्ती आहे. कदाचित देवानेच आपली भेट घडवून आणली असेल. माझा पंधरा वर्षाचा मुलगा गेली चार वर्षे आजारी आहे. कोणालाही या आजाराचे निदान करता आलेले नाही. तो बोलूं शकत नाही. तुम्ही तुमच्या शक्तीने त्याला बरं करा’’.
आता माधवला आपल्या शक्तीविषयी थोडा विश्वास वाटूं लागला. त्याने धनवानाच्या मुलाच्या अंगावर आपले हात ठेवले व म्हणाला, ‘‘पंधरा दिवसांच्याआंत तू इतर सर्व मुलांप्रमाणे बोलायला आणि हिंडाफिरायला लागशील’’.
या घटनेनंतर चारच दिवसांनी शहरांतून एक वैद्य आला. तो धनवानाला भेटून म्हणाला, ‘‘तुमच्या मुलाच्या आजाराविषयी मी ऐकले आहे. त्याच्या इलाजासाठी लागणारी सर्व औषधे माझ्याकडे आहेत. मी त्याला दहा दिवसांच्या आंतच बरा करीन’’.
वैद्याचे म्हणणें खरे ठरले. मुलगा एकदम बरा झाला. यामुळे सगळीकडे माधवर्ची कीर्ती पसरली.
एक दिवस माधव नदी किनारी गेला. तिथे एक गरीब बाई कपडे धूत होती. तिचा दहा वर्षांचा मुलगा इकडेतिकडे दगड फेकत खेळत होता. त्यांतला एक दगड माधवच्या डोक्याला लागला. वेदनेने माधव जोरांत ओरडला.
घाबरुन जाऊन मुलाने नदींत उडी मारली. त्याच्या आईला माहित होते की आपल्या मुलाला पोहायला येत नाही. ती माधवजवळ येऊन विनवूं लागली, ‘‘आपल्या शापाने माझा मुलगा नदींत पडला. त्याला पोहोता येत नाही.
आपणच त्याला बुडण्यापासून वाचवूं शकता.’’
माधव त्या बाईला धीर देत म्हणाला ‘‘घाबरूं नकोस! तुझा मुलगा पोहत कांठावर येईल.’’
No comments:
Post a Comment